26/11/2025
चिपळूण शहरातील गेली पाच वर्षे रखडलेले एसटी स्टॅन्ड किंवा महाराष्ट्र शासनाचे सरकारी कॉन्ट्रॅक्टरची कथित 50000 कोटी देय बिले थकलेली असताना सरकार फक्त चिपळूण शहर विकासासाठी 2000 कोटी कसे काय देणार आहे? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आला पाहिजे!
महाराष्ट्र राज्यात नगर परिषदा व नगरपंचायत साधारण पणे अंदाजे 400 आहेत, तर 29 महानगरपालिका आहेत, त्या सर्व ठिकाणी निवडणुका आहेत, तेव्हा सरकार तर्फे प्रत्येक ठिकाणी खिरापत वाटल्याप्रमाणे 1000-2000 कोटींची आश्वासने दिली जाणार आहेत. उद्या उपमुख्यमंत्री चिपळूण मध्ये येणार आहेत ते देखील मोठमोठ्या चिपळूण विकास कामांच्या घोषणा करणार आहेत. प्रश्न हा आहे की फक्त 44000 कोटी लाडकी बहीण योजनेवर खर्च करताना (जो विकास कामावरील खर्च म्हणून गणला जाणार नाही ) व शासनाच्या तिजोरीत खडखडात आहे. मुंबई गोवा महामार्ग काय अवस्थेत आहे आणि काय दर्जाचे काम चालू आहे, हे देखील सर्व जण पाहतच आहेत. असं असताना शासन एका शहरासाठी 2000 कोटीचे आश्वासन देते, ही आश्चर्यची बाब आहे. लोकांची मेमरी खूप कमी असते, जनतेला दिलेली आश्वासने ती लवकर विसरते हे राजकारण्यांना पण फार चांगल्या पद्धतीने माहित असते. त्यामुळे कोणताही पक्ष, त्यांचे नेते व सरकार मधील मंत्री आणि लोकप्रतिनिधी ही अशी आश्वासने देतच असतात, त्यात कोणाला काही गैर वाटणार नाही.
मात्र ही आश्वासने प्रत्यक्षात किती येतील, हवेत किती विरतील आणि पुढील पाच वर्षात खरोखरच लोकांच्या पदरी किती पडतील हे देखील पाहणे गरजेचे आहे. लोकांनी देखील शासन, पक्ष नेते, राजकारणी, मंत्री, नगरसेवक व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे वेळोवेळी अशी आश्वासने देतील ती विकासकामे का झाली नाहीत, हे विचारण्याचे धाडस केले पाहिजे.
या देशातील जनता फिल्म स्टार, क्रिकेटर व त्यानंतर राजकारणी यांची मोठी फॅन आहे. त्यांना जनता वेड्यासारखी follow करीत राहते. त्यांनी केलेले सर्व गुन्हे, चुका जनता माफ करते किंवा विसरून जाते.
जनतेने यावेळेस त्यांना मिळणारे सर्व उमेदवार व पक्षाचे जाहीरनामे जपून ठेवावेत व उमेदवार निवडून आल्यावर आपल्या वार्डातील नगरसेवक, नगराध्यक्ष व लोकप्रतिनिधी यांना त्यांच्या जाहीरनामा्यातील कामे कधी होणार हे विचारण्याचे धाडस केले पाहिजे.
यावेळेस चिपळूणमध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यातील 80% नवीन उमेदवार आहेत, त्यांना कौन्सिल कशी चालते त्यांचा अनुभव नाही, नसू शकतो. पण कमीतकमी नगरपरिषद अधिनियम काय आहेत याची माहिती करून घेणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर आज *26 नोव्हेंबर संविधान दिन* आहे, आजच्या दिवशी सर्व उमेदवार एकत्र येऊन किंवा लोकांच्या घरी जाऊन किंवा त्याना भेटताना *मी भारताचे संविधान साक्षी ठेवून नगरसेवक किंवा नगराध्यक्ष म्हणून काम करेन* असे सांगतील का? आणि त्याप्रमाणे काम करतील का हाच खरा प्रश्न आहे!
संजय चव्हाण
कर व गुंतवणूक सल्लागार
चिपळूण, 9403936301
# # 26 नोव्हेंबर संविधान दिन
जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान!!